भुजबळांकडे अपेक्षेप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा खाते   

मुंबई, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा खाते सोपवण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे या खात्याचा कार्यभार पुन्हा भुजबळ यांच्याकडे दिला जाईल, असा अंदाज होताच, तसे आदेश शुक्रवारी निघाले.
 
विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये भुजबळ यांना स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर त्यांचे मंगळवारी मंत्रिमंडळात पुनरागमन झाले. मागील सरकारमध्ये भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र, नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांच्याकडे या खात्याचा कारभार होता. आता अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भुजबळ काल नाशिकमध्ये होते. तेथे पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी याच खात्याला माझा प्राधान्यक्रम होता, असे सांगितले. 
 
कोरोना काळातही दोन वर्ष ज्यावेळी सगळे लोक घरात बसले होते, त्यावेळी मी शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक दुकानात अन्य धान्य पोहोचवले, कुठेही तक्रार येऊ दिली नाही. रात्रंदिवस आमच्या विभागाने काम केले. आता सुद्धा आमचं हेच ध्येय आहे की, एक तर पुढे गैरव्यवहार होता कामा नये. दुसरे संपूर्ण गोरगरिबांना चांगल्या प्रतीचे अन्नधान्य मिळावे. जिथे कुठे राज्यात मागास भटके असतील, त्यांना रेशन कार्ड तात्काळ पुरवणे आणि धान्य वाटप करणार आहे.  शिवभोजनच्या काही तक्रारी असतील, तर त्या सोडवाव्या लागतील. हे माझेच खाते होते. माझा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने ते मुंडे यांच्याकडे गेले होते. ते पुन्हा माझ्याकडे आले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
विभागाचा आढावा 
 
भुजबळ यांनी काल आपल्या खात्याची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर, मंत्रालय विस्तारीत इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील दालनात येऊन विभागाचा आढावा घेतला. यावेळी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भुजबळ यांना मंत्रालय विस्तारित इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील दालन वितरित करण्यात आले आहे. हे दालन पूर्वी मुंडे यांना देण्यात आले होते. याशिवाय, भुजबळ यांना शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिल येथील सातपुडा बंगला मिळाला आहे.
 
सावेंकडे दिव्यांग कल्याण विभाग 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  असलेल्या  दिव्यांग कल्याण विभागाचा कार्यभार आता अतुल सावे यांच्याकडे देण्यात आला आहे. सावे यांच्याकडे सध्या इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण,  दुग्धविकास,  नविनीकरणीय ऊर्जा आदी विभागांचा कार्यभार आहे. दिव्यांग कल्याण विभागाबाबतची   अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने काल प्रसिद्ध केली.

Related Articles